उचकी लागली.... करायचं काय ? उचकी लागण्याची कारणे व उपाय.

Admin

 उचकी लागली....  करायचं काय ? उचकी लागण्याची कारणे व उपाय.



विवेक वार्ता आरोग्य वार्ता -

उचकी येते म्हणजे नेमके काय होते? त्यावर कोणते घरगुती उपाय केल्यास उचकी थांबते हे पाहणार आहोत .

उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं?’ आपणही आपल्या जवळच्य़ा कोणाचीतरी  आठवण काढली असणार असं म्हणत पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी लगेचच थांबते. अनेकदा दिर्घ श्वास घेतल्यावर तर कधी साखर खाऊन ही उचकी थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर काही वेळा बरेच प्रयत्न करुनही ही उचकी थांबत नाही. आता उचकी येते म्हणजे नेमके काय होते? त्यावर कोणते घरगुती उपाय केल्यास उचकी थांबते याविषयी जाणून घेऊया...

 उचकी लागते म्हणजे काय? 


छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा (डायफ्रॅम) असतो. तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी आकस्मिकपणे या स्नायूंचे आकुंचन होते. डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते, परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो. प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो. उचकीमुळे श्‍वास बंद पडण्याची भीती नसते. म्हणजेच उचकी लागणे व श्वास थांबणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. मात्र या क्रियेमुळे आपल्याला श्वास थांबतो की काय अशी भिती वाटते पण ही भिती अनाठायीच असते.   काही वेळा घरगुती उपायांनी उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा लागतो. 

का लागते उचकी?  


डायफ्रामची मसल्स अचानक आकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते.

उचकी लागण्याचे ठोस कारण सांगता येत नाही पण ती सुरू होणे, किंवा गायब होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक आकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. तरीही उचकी लागण्याची काही साधारण कारणे सांगितली जातात. ती खालीलप्रमाणे....

१. मेंदूला जाणाऱ्या रक्तपुरवठ्यातील अडथळा २.अन्ननलिकेच्या अस्तराच्या दाहामुळे उचकी लागते. असा प्रकार जठरातून अन्ननलिकेत जाणाऱ्या अॲसिडयुक्त रसांमुळे होतो. 

३. अतिरेकी मद्यपानामुळे जठराच्या अस्तराचा दाह होतो.  

४. काही औषधांमुळे, विशेषतः भूल देताना वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे .

५. मेंदूतील विषाणुजन्य विकारामुळे काही दिवस सतत उचकी लागून मग आपोआप थांबते. 

६. जठर, अन्ननलिका किंवा घश्याच्या आतील भागातील सूज. 

७. जलद गतीने अन्न गिळणे.

 ८. मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन 

९. खूप तिखट व मसालेदार पदार्थाचे सेवन .

१०. अती थंड वा अती गरम पदार्थ खाणे.


उचकी थांबण्यासाठी काय कराल? 



१. एक कप पाण्यात २ वेलची आणि २ लवंग घालून चहाप्रमाणे उकळा, हे पाणी गाळून प्या. याने उचकी थांबण्यास मदत होईल.


२. उचकी लागल्यावर एक लांब श्वास घ्यावा आणि काही सेकंद रोखून ठेवावा. असे केल्याने फुफ्फुसात हवा भरुन राहते आणि उचकी आपोआप थांबते.


३. उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी काही वेळाने बंद होते.


४. उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते. 


५. दोन ते तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी प्यायल्यास उचकी बंद होईल.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top