माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू मानणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

Admin
 माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू मानणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ 
         साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे अण्णाभाऊ साठे एक लेखक, लोकशाहीर, तसेच समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. अण्णाभाऊनीं अनेक लोकनाट्ये, प्रवास वर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी पोवाडे, पटकथा यांचे लेखन केले. अण्णा भाऊंचा जन्म मातंग जातीत १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे, तर आईचे नाव वालूबाई साठे होते. त्यांचे दोन विवाह झाले होते. त्यांना मधुकर, शांता आणि शकुंतला अशी तीन अपत्ये होती.
   दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली आहे. मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची मराठीतील फार नावाजलेली कादंबरी. सदर कादंबरीला महाराष्ट्राच्या उत्तम कादंबरीचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. फकीरा कादंबरी मध्ये संपूर्ण समाज जीवनाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे. मातंग समाजातील लोकांच्या समस्या, त्यांचा पोटासाठीचा संघर्ष या सर्व गोष्टींचे दर्शन सदर कादंबरीतून घडते .याशिवाय त्याच्या वारणेचा वाघ, चित्रा, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंता, चिखलातील कमळ या काही कादंबऱ्या तसेच माझी मैना गावावर राहिली,मुंबईत उंचावरील यासारख्या कविता अण्णाभाऊनीं लिहिल्या. कृष्णाकाठच्या कथा, आबी, भरारी, निखारा, बरबाद्या कंजारी, पिसाळलेला माणूस, यासारखे कथासंग्रह तसेच बेकायदेशीर, लोकमंत्र्याचा दौरा, देशभक्त घोटाळे, अकलेची गोष्ट यासारखी लोकनाट्ये. 'माणूस' हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे.
  त्यांच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. 'ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे,' अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, तरीही या साहित्यिकांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. भांडवलशाही, मुंबईतील विषमता याच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
 त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अतिशय वेदनादायी आहे. साम्यवादी विचाराने अण्णा भाऊ भारावलेले होते. मुंबईत लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार केला. शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर, कॉ. डांगे यांच्याप्रमाणे मार्क्सवादी चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी माणसे जोडली. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला.
 नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तमाशाचा ढाचा बदलला. पूर्वीचे पारंपरिक आध्यात्म, पौराणिकता, आख्यानवजा स्वरूप बदलले. माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यावर कार मार्क्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद डांगे यांच्या विचारांचा खूप मोठा पगडा  होता. आधी साम्यवादी विचारसरणीचा अधिक प्रभाव त्यांच्यावर होता, पण नंतर ते आंबेडकरवादी झाले .त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग, धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे. त्यांचे साहित्य वैचारिक असून, त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे. बहुजन चळवळीचे नायक आहेत. अण्णा भाऊ 'दलित कथेचे शिल्पकार' आणि 'जय भीम, लाल सलाम' संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. 'माझा रशियाचा प्रवास'मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली.

अण्णा भाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दु:ख, दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा २७ भाषेत भाषांतरीत झाले आहे.           मुंबईतील चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हालाखीच्या अवस्थेत १८ जुलै १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 या साहित्यप्रतिभेच्या महामेरूला सरकारने 'भारतरत्न' घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा. जयंतीनिमित्त अण्णांना कोटी कोटी प्रणाम...
त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन... 
संपादक - प्रमोद काकडे
विवेक वार्ता.. 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top